दुःख कवटाळणारांना प्रगती करता येत नाही !

आपलं दुःख सतत जगासमोर मांडणारा वर्ग मोठा आहे. त्याच त्याच विषय दुःखाला कवटाळून जगण्याची सवय आयुष्य कमी करतेच.मुळात आयुष्य किती आहे?ते ही असं वाया जाताना थोडा तरी मनात विचार केला पाहिजे. भुतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी आठवत रहाण्याला काहीच अर्थ नाही. त्यातुन जो बोध,शिकवण घ्यायची ती घेऊन पुढे जाता आले पाहिजे.
आपण प्रवासात अनेक गावे फिरतो.ठिकाण कितीही सुंदर असले,निसर्गरम्य असले तरी आपण परतीच्या प्रवासाला लागतोच.कारण आपल्याला हे माहिती असते की इथं फार काळ थांबलो तर पुढचा प्रपंच थांबेल.म्हणून त्यात न अडकता आपण बाहेर पडतो.असं मनात साठलेल्या दुःखांना हकलता आलं पाहिजे.त्यासाठी परमार्थाची सोबत असली पाहिजे.
तुकोबाराय म्हणतात,
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥
येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥
करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥
तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥
एखाद्या गोष्टीचा शोक केला तर तो वाढतच जातो,म्हणून धीर धरला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे.
या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट न घडण्यासारखी नाही.येथे भीती,पळपुटेपणा चांगला नाही.
परमार्थात येण्याची तुमची मानसिकता आहे का?हा प्रश्न अनेजकांना विचारला असता ते म्हणतात,पाहु,करु,अजून कितीतरी आयुष्य पडलं आहे, काय घाई आहे?असे म्हणणारे लोक खुप आहेत. पण प्रत्यक्ष त्यात येणारे लोक फारच कमी आहेत.
तुकाराम महाराज म्हणतात,या नश्वर देहाला वेळीच तिकडे वळवण्यासाठी क्षणभंगुर जीवनात भक्तिचा एक जरी क्षण साधला तरी जीवनाचं सार्थक होईल.
रामकृष्णहरी


from Parner Darshan https://ift.tt/p1TKUBr
via IFTTT
Trulli